बोधकथा : उंदराची टोपी
एक होता उंदीरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले
एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला, “धोबीदादा,धोबीदादा माझे फडके
धुवून दे”. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदीरमामा गेला शिंप्याकडे. “शिंपीदादा,शिंपीदादा
मला एक छानशी टोपी शिवून दे, तिला रंगीत गोंडेही
लाव. शिंप्याने उंदीरमामाला सुंदर टोपी शिवून दिली.
उंदीरमामाने टोपी डोक्यावर घातली. एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ
लागला, “राज्याच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम ढुमक !” राजाने हे
ऐकले. तो शिपायांना म्हणाला, “जा रे,त्या उंदराला पकडून आणा.”
शिपायांनी
उंदीरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीरमामा म्हणाला, “राजा भिकारी,माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !” हे ऐकून राजा
खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदीरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर
घातली व तो गाणे गाऊ लागला “राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !” हे गाणे गात
गात तो राजवाड्यातून निघून गेला.
तात्पर्य : शक्तीपेक्षा
युक्ती श्रेष्ठ.
No comments:
Post a Comment